Categories
नाट्य-चित्र परिक्षण

राष्ट्रीय पुरस्कार सन्मानीत चित्रपट : ‘जयभीम कॉम्रेड’

एप्रिल - २०१२

रमाबाई नगरामध्ये घडलेला तो प्रकार आठवा
निशस्त्र होते दलित सारे, अमानुष तो गोळीबार आठवा
रक्त अजुनी सुकले नाही, रक्ताचा तो सडा आठवा
दलिता रं हल्ला बोलना, श्रमिका रं हल्ला बोलना….

            विद्रोही शाहीर कॉ.शंतनु कांबळे आणि सहकारी डफाच्या तालावर हे जोशपूर्ण संघर्षगीत गातानाचे दृश्य लघुपटकार आनंद पटवर्धनांच्या ‘जयभीम कॉम्रेड’ या माहितीपटात सुरवातीला दिसते आणि माहितीपट उलगडत जातो.

            सुमारे 14 वर्षांपूर्वी, महाराष्ट्रात सेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना 11 जुलै 1997 रोजी मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कुणा जातीयवाद्याने चपलांचा हार घातला. ही गोष्ट समजताच कॉलनीच्या परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनेचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. परंतु पोलिसांनी जमावाच्या भावना समजून न घेता, कुठलीही पूर्वसूचना न देता बेछूट लाठीमार आणि बेधुंद गोळीबार केला, ज्यात दहा निरपराध-निशस्त्र लोक मृत्यूमुखी पडले. अनेजकजण जखमी झाले. या गोळीबाराचे राज्यभर सर्वत्र पडसाद उमटले. पण शासनकर्ते मात्र बनावट ‘टँकरस्टोरी’ रचून अमानुष गोळीबाराचे उघड समर्थन करीत होते. पोलिसी दडपशाहीने हतबल झालेल्या निशस्त्र जनतेसाठी स्वत:ला क्रांतिकारी म्हणविणारे आपण काही करू शकत नाही, या नैराश्यातून आणि चळवळीच्या हतबल अवस्थेतून ‘आव्हान नाट्यमंच’ या डाव्या मार्क्सवादी विचारांच्या कलापथकांचे क्रांतिकारक लोकशाहीर डॉ.विलास घोगरे याने हत्याकांडाचा निषेध म्हणून 15 जुलै 1997 रोजी गळफास लावून आत्मबलिदान केले.

            ‘जयभीम कॉम्रेड’ ची सुरवात रमाबाई कॉलनीतील दलित हत्याकांडापासून होते. आणि एकतारी घेऊन विलास घोगरे पडद्यावर गाताना दिसू लागतो,

            अपनी मेहनत भाई, धरती की हुयी खुदाई
इस बीज को हमने बोया और धरती को दुल्हन बनाया…

            आनंद पटवर्धनांचा कॅमेरा रमाबाई नगरातील गोळीबारात शहीद झालेल्या नातेवाईकांच्या मुलाखतीमधून अमानवी गोळीबाराचे भीषण रूप दाखवतो आणि शासनाने रचलेली ‘टँकर स्टोरी’ कशी खोटी होती हे वेगवेगळ्या दृश्यांद्वारे आणि अनेकांच्या मुलाखतीमधून उघड करतो.

            या गोळीबारात कचर्‍याच्या गाडीवर काम करणरा एक शिक्षित सफाई कामगारही शहीद झाला. त्या निमित्ताने आनंदचा कॅमेरा मुंबईच्या डम्पिंग ग्राऊंडवर काम करणार्‍या सफाई कामगारांच्या नरकमय जीवनाचेही चित्रण करतो. दलित पँथरच्या लढाऊ आंदोलनाच्या काळात मुंबईतील वरळी, नायगाव, परळ या भागात दलित कार्यकर्त्यांवर कसे खुनी हल्ले झाले आणि त्यात पँथर भागवत जाधव, रमेश देवरूखकरसारखे कार्यकर्ते कसे शहीद झाले, याची माहिती शहीद भागवत जाधवांचे कनिष्ठ बंधू, रिपब्लिकन पँथरचे सुमेध जाधव यांच्या मुलाखतीतून कळते.

            महाराष्ट्र हे म.फुले, डॉ.आंबेडकरांचे पुरोगामी राज्य असल्याचे ढोल नेते सतत बडवीत असतात. परंतु याच महाराष्ट्रात आजही दलित-शोषित समाजावर तथाकथित उच्चवर्णीयांकडून मोठ्या प्रमाणात सामाजिक अत्याचार होत आहेत, दलित स्त्रियांची अबू्र लुटण्यापासून ते नग्न धींड काढण्यापर्यंतचे प्रकार घडत आहेत. दलितांचे डोळे काढण्यापासून ते जिवंत जळण्याचे प्रकार होत आहेत. मराठवाड्यातील अन्यायपीडित कुटुंबियांच्या मुलाखतीतून हे सत्य पुढे येते. अन्याय करणारे उच्चवर्णीय आरोपी आणि पोलिसांचे साटेलोटे असल्यामुळे दलितांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ सारख्या कायद्यांचीही योग्य अंमलबजावणी होत नाही व सत्ताधार्‍यांच्या दबावामुळे गुन्ह्यांचा योग्य तपास न होता अत्याचार करणारे मोकाट सुटतात, हे महाराष्ट्राचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री.प्रभाकरन यांनी उघडपणे मान्य केल्याचे पहावयास मिळते.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी गद्दारी करून राजकारण करणार्‍या आजच्या दलित नेत्यांच्या उक्ती-कृतीमध्ये कशी विसंगती आहे, बाबासाहेबांच्या नावाने भरवल्या जाणार्‍या उत्सवातून अंधभक्त कसे बनवले जात आहेत यावर दलित पँथरचे ज्येष्ठ नेते भाई संगारे व विदर्भातील रिपब्लिकन पँथरचे कीर्तनकार अशोक सरस्वती यांनी आपल्या भाषण व गाण्यातून कोरडे ओढले आहेत. शाहीर संभाजी भगत गातात,

            वाटे भीमाचे घातले गा बाई, त्याची जाहिरात केली गा बाई
            माझा भीम जेरबंद केला गं बाई, त्याचे आहे का कुणाला काई….

            ब्राह्मण संमेलनातून, छावासारख्या मराठा संघटनांच्या कार्यक्रमातून जात्याभिमान जोपासला जातो, वर्णश्रेष्ठत्वाचे गौरवीकरण केले जाते आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या विरोधात तलवारी उपसण्याची वेळ आल्याची भडक विधाने केली जातात. या वास्तवावर बोट ठेवतानाच धार्मिक-जातीय हिंसाचाराला प्रोत्साहन देणार्‍या राज्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार्‍या व सरड्याप्रमाणे रंग बदलणार्‍या दलित नेत्यांचेही माहितीपटात वस्त्रहरण करण्यात आले आहे.

            खैरलांजी हत्याकांडानंतर दलित व डाव्या सामाजिक संघटना एकजुटीने लढण्याचा, सांस्कृतिक-राजकीय प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, याचे प्रभावी चित्रण पहायला मिळते. ‘कबीर कलामंच’च्या शीतल साठे, सचिन माळी या सर्जनशील कलावंत कार्यकर्त्यांना पोलिसी दडपशाहीमुळे कलापथके बंद करून कसे भूमिगत जावे लागले, याची हृदयद्रावक कहाणीही शीतल साठेच्या आईच्या तोंडून माहितीपटात ऐकायला मिळते.

            या माहितीपटाचे वैशिष्ट्य हे की, आंबेडकरी आणि क्रांतिकारी कष्टकर्‍यांच्या चळवळीतील गाण्यांचा समर्पक व चपखल उपयोग चित्रपटदिग्दर्शक ठायीठायी करतो. त्यात शाहीर आत्माराम पाटलांची शाहीर कृष्णकांत जाधव यांच्या आवाजातील ‘ज्ञातिविसर्जनाची लावणी’ आहे, शीतल साठेचे काळजाचा ठाव घेणारे ‘माझी माय’ हे गीत आहे, सचिन माळीचे ‘समतेचा रथ भिमाचा मागं कोणी नेला’ हे आजच्या दलित चळवळीवर परखड भाष्य करणारे गीत आहे. विलास घोगरेंचे ‘राघू मुंबईला चालला’ हे गाणे आहे. अलिकडे डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात कव्वाली, सवाल-जवाब गाण्यातून जो बिभत्स व बाजारू संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे त्यावरही काही दृश्यांतून प्रहार केला आहे.

            हा माहितीपट दलित-शोषित कष्टकर्‍यांवरील अन्यायाविरूद्ध आवाज उठविणारे आणि समतेचे राज्य निर्माण करण्यासाठी जगातील समग्र कष्टकर्‍यांची एकजूट उभारण्याचे स्वप्न पहाणारे कॉम्रेड आर.बी.मोरे, कॉ.के.एम.साळवी, लोकशाहीर कॉ.अण्णाभाऊ साठे, कॉ.भास्करराव जाधव, विद्रोही साहित्यिक बाबूराव बागुल, कवी-नाटककार कॉ.मनोहर वाकोडे, कॉ.शरद पाटील, कॉ.जी.एल.रेड्डी, कविवर्य नारायण सुर्वे, डॉ.सदा कर्‍हाडे यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे काम करतो. तो सर्वसामान्य दलित-शोषित कार्यकर्त्यांच्या मनातली खदखद, प्रस्थापित राजकीय नेत्यांविषयी-सत्ताधार्‍यांविषयी असंतोष व्यक्त करतो. त्यामुळेच मुंबईतील रमाबाई कॉलनी, भायखळा लव्हलेन, चेंबूरसारख्या वस्त्यांमध्ये उघड्यावर होणार्‍या या माहितीपटाच्या खेळाला प्रचंड उपस्थिती लाभते. साडेतीन तासांचा हा माहितीपट लोक सलग उभे राहून पाहतात. नेपाळपासून ते मुंबईच्या चित्रपटमहोत्सवापर्यंत या माहितीपटाला लोकांनी डोक्यावर घेतले आहे. अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहेत. आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीनेही त्याला गौरवून एकप्रकारे माहितीपटातील वास्तव मान्य केले आहे.

            माहितीपटाला ‘जयभीम कॉम्रेड’ असे आकर्षक शीर्षक असल्यामुळे अधिक वैचारिक सशक्त आशयाची अपेक्षा होती, पण त्या दृष्टीने तसेच संकल्पनेबाबत माहितीपटात त्रुटी जाणवते. तरीही हा माहितीपट सर्वत्र दाखविला गेला पाहिजे असे वाटतेच. तो बनवण्याचे धाडस करणार्‍या आनंद पटवर्धनांना सलाम!

सुबोध मोरे

महाराष्ट्र टाईम्सवरून साभार