Categories
ज्योतिष

नाटकाचे भविष्य..!

जानेवारी - २०१५

जयवंत दळवी हे महाराष्ट्रात नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. बॅरिस्टर, सूर्यास्त, सावित्री, कालचक्र, स्पर्श अशा अनेक नाटकांनी दळवींचे नाव महाराष्ट्राच्या नाट्यप्रेमींच्या मनात बसले आहे. डॉ. वि.मा.देशपांडे संपादित ‘माझा नाट्यलेखन दिग्दर्शनाचा प्रवास’ हे पुस्तक २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९८८ साली प्रसिद्ध झाले. त्यात कुसुमाग्रज, कानेटकरांपासून गो. पु. देशपांडे ते अमोल पालेकरांपर्यंत डझनभर नाटककार दिग्दर्शकांनी आपले नाट्यविषयक अनुभव लिहिले आहेत. जयवंत दळवी यांनीही आपले अनुभव शब्दबद्ध करताना काही गोष्टी सांगितल्या आहेत.
दळवींचा एक मित्र १९६८ साली त्यांच्या ऑफीसमध्ये आला. काका केणी हे त्यांचे नाव. राष्ट्र सेवा दलाचे ते कार्यकर्ते होते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना मुक्त व्हावे म्हणून साने गुरूजींनी प्राण पणास लावून उपोषण केले. या प्रश्नावर लोकमत जागृत करणेसाठी बापटांच्या नेतृत्वाखाली कलापथक स्थापन करण्यात आले. दळवींच्या मित्राने म्हणजेच काका केणी यांनी दळवींच्या आग्रहाखातर नोकरी सोडून वर्षभर प्रचार केला. वर्षानंतर नोकरी शोधता शोधता ते पुन्हा दळवींकडे आले. काकांचा भविष्यावर खूप विश्वास. भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाने ‘तू नाटक कंपनी काढलीस तर ती तुफान चालेल’ असे सांगितले. काकांना अरविंद गोखले यांची ‘उभा जन्म उन्हात’ ही कथा आवडली. त्या ज्योतिषानेही ती कथा मंजूर केली. काकांनी मराठीतील दहा लेखकांची व नाटककारांची एक यादी ज्योतिषाकडे दिली. त्यातल्या दळवींच्या नावावर ज्योतिषाने खूण केली. काकांची कुंडली पाहून, काकाने विचारलेल्या प्रश्नांची कुंडली मांडून त्या ज्योतिषाने भविष्य वर्तविले की, ‘काकांची कंपनी – गोखलेंची कथा – त्यावर दळवींचे नाटक या त्रिवेणी संगमाने या नाटकाचे हजारो प्रयोगांची गॅरंटी अर्थात काकांची आर्थिक भरभराट होईल. काकांचा भविष्यावर विश्वास होताच. गळ घालून त्यांनी दळवीकडून नाटक लिहिण्याचे कबूल करून घेतले. लेखनाचा प्रारंभही काकांनी काढून आणलेल्या मुहुर्तावर ‘शुभदिवशी’ केला. घड्याळाचा काटा ठरल्या आकड्यांवर येताच कर सुरू अशी काकाने आज्ञा केली. दळवींनी पहिली ओळ लिहिली. नाटक लिहून पूर्ण झाले. मुंबईतल्या पहिल्या प्रयोगाला दळवी गेले नव्हते. काका भोळे होते. प्रेक्षक कंटाळून चेष्टा करत होते. टाळ्या मारीत होते. काकांना वाटले नाटक ‘हिट’ झाले. चौदा-पंधरा प्रयोग काकांनी स्वखर्चान केले. साठवलेली पुंजी खर्च झाली. कर्जबाजारी झाले. शेवटी भविष्य खोटे ठरले. हे नाटक पूर्ण अपयशी ठरले.
खरी गंमतीची व गंभीर गोष्ट अशी की, भविष्य कसे चुकले याचा अभ्यास काकांनी सुरू केला. ते स्वतःच ज्योतिषी झाले. रंगभूमीला कायमचा रामराम ठोकून काका मोठे ज्योतिषी झाले. दुसऱ्यांना भविष्य सांगून रंगभूमीवर होत नव्हती एवढी कमाई काकाने केली. जयवंत दळवींनी या घटनेवर लिहिले आहे ते म्हणतात ‘काकाच्या वेळी माझाही भविष्यावर विश्वास होता. पण अशा घटना पाहिल्यावर, अनुभवल्यावर माझा भविष्यावर आता मुळीच विश्वास नाही.
दुसरा एक किस्साही दळवींनी नोंदवलाय. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा कुंडल्यांचा अभ्यास उत्तम आहे. दळवींची पत्रिका पाहून दळवी, तुम्हाला जन्मात नाटक जमणार नाही.’ असे भाकीत पाडगावकरांनी केले. दळवींच्या पत्रिकेत कुठल्यातरी दोन ग्रहांचा बहुधा शनी-मंगळ यांचा केंद्रयोग झाल्यामुळे त्यांच्याभोवती गर्दी जमणार नाही असे पाडगावकरांनी सांगितले होते. परचुरे प्रकाशनचे ग. पां. परचुरे हे दळवींकडे नाट्यलेखनाविषयी विचारण्यासाठी आले असता दळवींनीही स्पष्ट नकार दिला आणि पाडगावकरांचे भविष्य त्यांच्या कानावर घातले. परचुरेंचाही भविष्यावर विश्वास होता. दळवींना टाळून परचुरे निघून गेले.
दोन दिवसांनी परचुरे नाटककार स.अ. शुक्ल यांचे बरोबर दळवींकडे आले. शुक्ल ज्योतिषातले जाणकार. प्रत्यक्षात आचार्य अत्रे यांचे भविष्य सांगणारे. त्यांनी दळवींकडे कुंडली मागितली. न्याहाळून, आकडेमोड करून म्हणाले, ‘काय सांगतात पाडगावकर? कसला केंद्र योग? तुम्ही उत्तम नाटककार व्हाल तुम्ही नाटक लिहा मात्र एक करा नाटकाच्या नावातले पहिले अक्षर ‘स’ असून दे. भविष्य खरे ठरेल या आशेने दळवींनी नाट्यलेखनाला प्रारंभ केला. ‘सभ्य ग्रहस्थ हो’ या दळवींच्याच कथेचे पुढे नाटकात रूपांतर त्यांनी केले. परचुरेंनी आरंभशूर होऊन नाटकाची जबाबदारी आत्माराम भेंडेवर सोपवली. आत्माराम भेंडे व बबन प्रभू त्यात काम करणार होते. नाटकाच्या तालीम सुरू झाल्या. दरम्यान प्रभूंना एका निर्मात्याने प्रलोभन दाखवून ओढून नेले. नाटक थांबवावे लागले. पुढे मागे योग्यवेळी विचार करू असे दळवी व परचुरेंनी ठरवले. एके दिवशी गोवा हिंदू असोसिएशनचे रामकृष्ण नाईक आले. ‘सभ्य गृहस्थ हो’ त्यांना आवडले होते. परचुरेकडून नाटक घेऊन दामू केंकरेच्या दिग्दर्शनाखाली नाटक तयार केले. ‘सभ्य ग्रहस्थ हो’ हे विनोदी नाटक असल्याने त्याचे दोन तीनशे प्रयोग होतील आणि आपले मागील नुकसान भरून निघेल असे गोवा हिंदू असोसिएशनला वाटले होते. पण हाय रे भविष्य. ‘सभ्य गृहस्थ हो’ हे नाटक ५० प्रयोगातच थांबवावे लागले.
फलज्योतिषावर विसंबून राहिल्याने काय होऊ शकते याचे हे नाट्यप्रयोगातील प्रसिद्ध व्यक्तीचे उदाहरण पाहून आपण मनापासून म्हणू या. ‘फलज्योतिषावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.’ होय ना?

उमेश सुर्यवंशी, कोल्हापूर

संपर्क : मोबा. ९९२२७८४०६५